Thursday 30 March 2023

धर्मरेषा वितळवणारी हिंदुस्थानी संगीत परंपरा

  बाराव्या-तेराव्या शतकापासून हिंदुस्थानी संगीतात अनेक स्थित्यंतरं झाली. या सर्व स्थित्यंतरांचा उगम, प्रेरणा या पारंपरिक देशी संगीतामध्ये होत्या. ध्रुपद गायकी जाऊन त्या जागी ख्याल गायकी आली, टप्पा आला, नंतर ठुंबरी, कव्वाली आली – हे सर्व गायनप्रकार भारतातल्या निरनिराळ्या प्रांतांतल्या देशी गायनपद्धतीतूनच निर्माण झाले. हिंदुस्थानी गायकीची जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर, किराणा अशी घराणी अस्तित्वात आली. मध्ययुगापासून हिंदुस्थानी गायकीची परंपरा पुढे चालवणारे गायक बव्हंशी मुस्लिम होते. आणि ते जोपासत असलेल्या संगीत-परंपरेत हिंदू धार्मिक परंपरांमधले अनेक घटक मिसळलेले होते. पण त्यांचं मुस्लिम असणं या गायकीच्या कधी आड आलं नाही. आधुनिक काळातल्या ज्या महान गायक-कलावंतांची चरित्रं आज उपलब्ध आहेत, त्यांत या हिंदु-मुस्लिम सांस्कृतिक मिलाफाची काही मनोरम उदाहरणं सापडतात. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले अनेक मुस्लिम गायक हिंदुस्थानी संगीतातल्या हिंदू भक्तिगीतांचा, संगीताचा आविष्कार करताना इथल्या धार्मिक परंपरांशी एकरूप झाले. त्यांच्या चरित्रांमध्ये विखुरलेल्या अशा काही आठवणी इथं नोंदवून ठेवतो आहे. आजच्या धार्मिक अस्मितांच्या ध्रुवीकरणाच्या आत्यंतिक विखारी आणि विषारी उद्रेकाच्या काळात अशा काही आठवणींचे झरे जपून ठेवणं, त्यांना पुन्हा पृष्ठस्तरावर आणणं गरजेचं वाटतं. 

    जयपूर घराण्याचे गायक अल्लादिया खाँ यांना छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आश्रय दिला होता. उत्तर भारतात राजेरजवाड्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या घराण्यांच्या गायकांनी आपापलं बस्तान बसवलं. उपजीविकेच्या शोधात काही गायकांनी दक्षिण दिशा धरली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस त्यापैकी काहींचा पडाव महाराष्ट्रात पडला. अल्लादिया खाँ अशा गायकांपैकी होते. ते सांगत की त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष हिंदू होते. त्यांचं नाव नाथ विश्वंभर. ते संगीतोपासक होते. स्नानसंध्या, पूजाअर्चा, इत्यादींच्या मंत्रांचं पठणही ते रागरागिणीत करत. तानसेन याचे गुरू हरदास हे या नाथ विश्वंभरांचे पूर्वज. या नात्याने अल्लादियां खाँ स्वतःला थेट तानसेनाच्या परंपरेशी जोडून घेत. अल्लादियां खाँ आपलं गोत्र, जात वगैरेही सांगत. गोत्र शांडिल्य आणि जात आद्य गौड ब्राह्मण. तीन प्रवर, अंजनीसूत्र वगैरेंची संध्येमधील संथा त्यांना पिढीजाद परंपरेतून मिळाली. त्यांना वाडवडलांकडून मिळालेल्या गाण्याच्या चिजा ते म्हणत. त्यात शंकर, गणपती, सरस्वती, राम, कृष्ण या देवतांच्या स्तुतीपर रचना होत्या.

    दुसरं उदाहरण ग्वाल्हेरचे निसारहुसेन खाँ यांचं. हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे (वझेबुवा) यांचे गुरू. त्यांची राहणी ब्राह्मणी पद्धतीची असे. ते गळ्यात जानवं घालीत आणि श्रावणातल्या सोमवारचा उपवासही करीत. निसारहुसेन खाँ यांना लहानपणी त्यांच्या घरच्यांनी शास्त्रीपंडित नेमून संस्कृतचंही शिक्षण दिलं होतं. केशवराव भोळे यांनी अस्ताई या पुस्तकात ही माहिती देऊन लिहिलंय की या शिक्षणामुळे त्यांची वाणी शुद्ध व सुसंस्कृत झाली होती. ती इतकी की त्यांचे बोलणे ऐकताना त्यांची जात ओळखणे त्या काळी फार कठीण जाई. निसारहुसेन खाँ यांना भागवतातले संस्कृत श्लोक आणि मोरोपंतांच्या मराठी आर्या पाठ येत होत्या. ते म्हणायचे, मला मागल्या जन्मी गायन शिकण्याची इच्छा झाली म्हणून मी मुसलमानी धर्मात जन्म व घेतला व गाणं शिकलो. आता ती इच्छा पूर्ण झाली. पुढल्या जन्मी मी पुन्हा ब्राह्मणाचा जन्म घेणार आहे. असं म्हणून ते गळ्यातलं जानवं दाखवत.

    तिसरं उदाहरण मूळ त्रिपुराचे असलेल्या उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचं. हे अल्लाउद्दिन खाँ म्हणजे प्रसिद्ध सतारिये अलिअकबर खाँ यांचे वडील आणि पंडित रविशंकर यांचे सासरे. निसारहुसेन खाँ यांच्याप्रमाणे उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचीही राहणी ब्राह्मणी वळणाची होती. १९३६ साली पंडित पलुस्करांचे शिष्य बी. आर. देवधर अलाहाबादला संगीत परिषदेसाठी मुक्कामी होते. सकाळी सात वाजता त्यांना एक ब्राह्मण मनुष्य खांद्यावर पंचा टाकलेला, चालत येताना दिसला. जवळ आल्यावर देवधरांच्या लक्षात आलं की ते अल्लाउद्दिन खाँ आहेत. इतक्या सकाळच्या थंडीत कुठं निघाले असं देवधरांनी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, “आज एकादशी आहे. सुदैवाने मी गंगेच्या काठी आहे, म्हणून गंगास्नानासाठी जात आहे. हे ऐकल्यावर, आपण हिंदू असूनही आपल्याला ना एकादशी आठवली ना गंगा आठवलीम्हणून देवधर शरमले. अल्लाउद्दिन खाँच्या वागण्यात मात्र सहजपणा होता. त्यांच्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या हिंदू परंपरा पाळल्या जात होत्या. आपले पूर्वज वैष्णवपंथी हिंदू होते, आणि नऊ पिढ्यांपूर्वी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असं ते सांगत. त्यांच्या घराण्यात मांसभक्षण वर्ज्य होतं. त्यांचे वडील शिवभक्त होते आणि थोरले भाऊ कालीदेवीचे भक्त होते. हे अल्लाउद्दिन खाँ त्रिपुरामधल्या ज्या शिवपूर नावाच्या गावचे होते, तिथं शंकराचं एक प्रसिद्ध मंदिर होतं. आणि या शंकराच्या यात्रेला हिंदू-मुस्लिम असे दोन्ही धर्माचे लोक मोठ्या संख्येने येत. अशी अनेक ठिकाणं भारतात आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. अल्लाउद्दिन खाँचे वडीलही या शंकराचे निस्सिम भक्त होते.

    किराणा घराण्याचे गायक अब्दुल करीम खाँ यांची जवळजवळ सारी कारकीर्द महाराष्ट्रात गेली. अब्दुल करीम खाँचे शिष्य सवाई गंधर्व आणि त्यांचे शिष्य भीमसेन जोशी. या अब्दुल करीम खाँ यांचा विसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसऱ्या दशकात पुण्या-मुंबईत भरपूर वावर होता. त्यावेळी प्रार्थना समाजाचे डॉ. रा. गो. भांडारकर, कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्याशी त्यांचा संबंध आला. या दोघांनीही अब्दुल करीम खाँ यांना गायत्री मंत्रासह आणखी चारसहा मंत्र शिकवले आणि हे संस्कृत मंत्र रागदारीमध्ये बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अब्दुल करीम खाँ ओम् नमशिवाय’, गायत्री मंत्र वगैरे हिंदू परंपरेतले मंत्र रागामध्ये म्हणून दाखवत असत. भांडारकरांच्या मुलीला गाणे अब्दुल करीम खाँ यांनी शिकवलं. अब्दुल करीम खाँ यांनी पुण्यात निवासी संगीत विद्यालय सुरू केलं. अनेक जातींची मुलं तिथं शिकत. पुण्यातल्या सनातन्यांना याचा तिटकारा असल्याने अब्दुल करीम खाँ यांना तिथून हुसकावून लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा भांडारकर, आपटे यांनी मध्यस्ती करून वाड्याच्या मालकाची समजूत घालून ते विद्यालय चालू राहील असं पाहिलं.

    या गायकांची चरित्र-पुस्तकं आता हळूहळू विस्मृतीत लोटली जात आहेतकाही वर्षांनी ती कुणाच्या नजरेसही पडणार नाहीत. ही चरित्रं वाचलेली माणसंही काळाच्या पडद्याआड जातील. तेव्हा हा दोन धार्मिक परंपरांच्या समन्वयाचा मनोरम इतिहासही अज्ञातात नाहीसा होईल. इथं केलेल्या नोंदी म्हणजे हा इतिहास अज्ञातात गडप होण्यापासून वाचवण्याचा एक क्षीण प्रयत्न.

                                                                           

    

Sunday 29 August 2021

जयंत पवारची एक अद्भुत कथा

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र

 

 

कितीही वस्तुनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या साहित्यकृतीची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करण्याच्या प्रयत्नात व्यक्तिगत आवडीचा काही अंश उतरतोच. जयंत पवार यांची छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्याबाबतीही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत. या कथेचा घाट आणि तिच्यातून लेखकाने व्यक्त केलेलं जीवनभान या दोन्ही अंगांनी ही कथा वाचकाला फार समृद्ध करणारा अनुभव देते. मराठी साहित्य, मराठी समाज, कला आणि जीवन यांच्यातलं नातं अशा व्यापक विषयांवर भाष्य करणारी ही कथा मराठीतली श्रेष्ठ कथा आहे असं माझं मत आहे.

जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या पहिल्या कथासंग्रहातली ही अखेरची कथा आहे. पण या कथेपासून कथाकार म्हणून जयंत पवार यांनी एक नवं, निर्णायक वळण घेतलं आहे. याच वळणाने वरणभात लोन्चा न् कोन नाय कोन्चा या त्यांच्या दुसऱ्या कथासंग्रहातल्या कथा अधिक पुढं गेल्या आहेत. तरीही छटाकभर रात्र... या कथेला जयंत पवार यांच्या एकूण कथासाहित्यात आणि एकंदर समकालीन मराठी कथासाहित्यात महत्त्वाचं स्थान आहे.

कादंबरीच्या तुलनेत कथेचा अवकाश लहान, मर्यादित असतो. या मर्यादित अवकाशात एखादा कथाकार अनेक आशयसूत्रांची, रचनेच्या,कथनाच्या बहुविध पातळ्यांची अशी काही व्यामिश्र बंदिश रचतो की वाचकाने थक्क व्हावं. जयंत पवारांची छटाकभर रात्र... ही कथा अशा तऱ्हेचा अनुभव देते.

या कथेचा आकृतिबंध एका गुन्हेगारकथेचा किंवा रहस्यकथेचा आहे. पण मानवी अस्तित्वाचं आणि दुःखाचं नातं काय असतं या सनातन आधिभौतिक (metaphysical) रहस्याचा मागोवा हे या कथेचं मुख्य आशयसूत्र आहे. खून, मारामाऱ्या आणि अपघात याही कथेत आहेत. पण त्यासोबत बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बसून केलेल्या जीवनाविषयीच्या तात्त्विक चर्चा आहेत. मुंबईसारख्या महानगरातलं गुंड, दारुड्यांचं अधोविश्व आणि लेखक-कवींचं जग या दोन जगांचं ब्लेंडिंग छटाकभर रात्र... या कथेत जयंत पवार यांनी अत्यंत परिणामकारकरित्या केलं आहे.  

रहस्यकथेत अखेरपर्यंत सामान्यतः रहस्य उलगडलेलं असतं; गुन्हेगार कोण याचं उत्तर दिल्याशिवाय रहस्यकथा संपत नाही. छटाकभर रात्र...या कथेत मात्र लेखकाने कथेच्या गाभ्याशी असलेला मुख्य प्रश्न अनुत्तरित ठेवलेला आहे. आणि केवळ गाभ्याचा प्रश्न नव्हे, तर रहस्यमय कथानकातले आणि त्याच्याआड दडलेल्या मानवी जीवनाच्या सत्याविषयीचे सगळेच प्रश्न लेखकाने अधांतरी सोडून कथा संपवली आहे. ही अशी विपरित रहस्यकथा आहे. 

रहस्यकथेचा असा विपरित आकृतिबंध लेखकाने का योजला असेल? आधुनिक साहित्यात खूपविक्ये (bestsellers), लोकप्रिय साहित्यप्रकार बिनप्रतिष्ठेचे मानले जातात. गंभीर साहित्यप्रकार अभिरुचीच्या शिडीवर वरच्या पायरीवर प्रस्थापित झालेले असतात. अलीकडे उत्तराधुनिकवादी विचाराने जीवनातल्या अनेक श्रेणीव्यवस्थांना सुरूंग लावला, त्यात साहित्यप्रकारांची ही श्रेणीव्यवस्थाही कोसळली. लोकप्रिय साहित्याचे आकृतिबंध आणि गंभीर आशय यांचं ब्लेंडिंग केलं जाऊ लागलं. जयंत पवार यांनी छटाकभर रात्र...मध्ये असं ब्लेंडिंग केलं आहे, ते केवळ प्रयोग म्हणून नव्हे. गंभीर जीवनाशय मांडताना त्याच्या विपरित वाटणारा लोकप्रिय कथाप्रकार निवडून त्यांनी सध्याच्या जीवनाविषयी एक महत्त्वाचं भाष्य अतिशय सूचकपणे केलं आहे.

जयंत पवारांनी आकृतिबंध निवडलाय तो रहस्यकथेचा. आता रहस्यकथा या साहित्यप्रकाराची मूलप्रेरणा काय आहे? तर सत्याचा शोध घेणे. प्रत्येक रहस्याच्या मुळाशी एक न उलगडलेले सत्य असतेच; आणि पुराव्यांचा कसोशीने शोध घेऊन त्यांच्यातील संगती शोधल्यास, अन्वय लावल्यास ते सत्य सापडते, असा विश्वास रहस्यकथेच्या निर्मितीमागे आहे. रहस्यकथेच्या मूलप्रेरणेचं नातं पुन्हा आधुनिक जीवनदृष्टीशी आहे. विवेकशील,वस्तुनिष्ठ दृष्टीने शोध घेत गेल्यास मानव सृष्टीचं रहस्य भेदून सत्य ज्ञान हस्तगत करू शकतो असा दुर्दम्य आत्मविश्वास या आधुनिक जीवनदृष्टीत आहे. सगळ्या आधुनिक शास्त्र-विज्ञानांचा उदय याच जीवनदृष्टीतून झाला आहे. तिथे सत्याचा ठामपणा आहे. रहस्यकथेचं थेट नातं या ठामपणाशी आहे. 

याच्या उलट जयंत पवार यांच्या कथेचा रहस्यकथालेखक असलेला निवेदक जरी सत्याचा पाठपुरावा करत असला, तरी सत्य शोधण्यात त्याला सपशेल अपयश येतं. तो लोकप्रिय रहस्यप्रधान-गुन्हेगारी कथालेखक असला, तरी त्याची ही कथा मात्र रूढ प्रकारची क्राइमस्टोरी नसल्यामुळे कुठेही प्रसिद्ध होऊ शकत नाही. त्याआधी हा लेखकच संसर्गजन्य तापाच्या साथीत मरून जातो. कथा गंभीर वळणाची नसल्यामुळे तिला प्रतिष्ठित दर्जा मिळणं तर शक्यच नसतं, आणि रहस्याचा भेद करू न शकल्यामुळे (फसलेली गुन्हेगारी कथा झाल्यामुळे) ती रहस्यकथा म्हणूनही उभी राहू शकत नाही; तिला प्रसिद्धीचा प्रकाशही दिसत नाही. अशा प्रकारे जयंत पवारांनी बाज रहस्यकथेचा स्वीकारला आहे, पण रहस्यकथेचं मूलतत्त्वच मोडीत काढलं आहे. मानवी जीवनातला सत्याचा शोध अखेर संदिग्धतेच्या धुक्यात हरवून जातो, सत्य हे मानवी आकलनापलीकडे राहतं, असं या रहस्यकथेतून सुचवलं आहे. 

पण जयंत पवार इथंच थांबत नाहीत. रहस्यकथेचा निवेदक किंवा इतर पात्रं सत्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीत? हा प्रश्न त्यांनी कथेच्या अखेरच्या भागात उपस्थित केलेला आहे. आणि तिथं आपल्या लक्षात येतं की, लेखकाने लोकप्रिय, खूपविक्या साहित्यप्रकाराचा आकृतिबंध योजून एकप्रकारे या प्रश्नाचं, समस्येचं निदान करण्याचा प्रयत्न केला आहे. ते निदान काय आहे याचा विचार शेवटी करू. इथं एवढं मात्र नमूद करू की, श्रेष्ठ साहित्यकृतीचा घाट देखील तिच्या आशयाचा, लेखकाच्या जीवनदृष्टीचा अविभाज्य भाग होऊन अनुभवास येत असतो. हा अनुभव छटाकभर रात्र...ही कथा देते म्हणून ती श्रेष्ठ कथा आहे.

 

प्रत्यक्ष आयुष्यात सत्य हे संदिग्ध असतं, त्याविषयी नेमकं काही सांगता येत नाही, हा अनुभव अनेकांनी घेतलेला असू शकतो; साहित्यातही हा अनुभव मांडणारी छटाकभर रात्र... ही काही एकमेव साहित्यकृती नव्हे. मग या कथेत वेगळं, नवं काय आहे? का ही कथा एक ताजा अनुभव देते?याचं उत्तर आपल्याला, जयंत पवारांनी या कथेमध्ये परस्परविरुद्ध भासणाऱ्या, पण कथानकात अगदी एकजीव झालेल्या बहुविध संदर्भांमध्ये सापडेल.

बऱ्याच लेखकांना प्रत्यक्षातल्या व्यक्तींवरून पात्रं बेतण्याचा, आणि वाचकाला ती पात्रं कोणत्या व्यक्तीवरून घेतलेली आहेत हे सहज लक्षात यावं असे दुवे कथानकात सोडण्याचा नाद असतो. अशा लेखकांनी रंगवलेली पात्रं बहुतेकदा प्रत्यक्षातल्या व्यक्तींचे कॅरिकेचर्स तरी असतात किंवा प्रत्यक्षातील व्यक्तींच्या चरित्रात्मक तपशिलावरच पात्रं हुबेहूब उभारलेली असतात. छटाकभर रात्र... या कथेत रहस्यकथाकारम्हणून स्वतःची ओळख करून देणारा निवेदक आणि कवी म्हणून वावरणारी चार पात्रं प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींवर बेतलेली आहेत. पण कथेतली ही पात्रं ना प्रत्यक्षातल्या व्यक्तींची कॅरिकेचर्स आहेत, आणि ना त्यांच्या जीवनातल्या केवळ चरित्रात्मक तपशिलांचा वापर लेखकाने पात्रनिर्मितीसाठी केला आहे. प्रत्यक्षातल्या लेखक-कवींची व्यक्तिमत्त्वं, वैचारिक भूमिका, जीवनदृष्टी यांचं कथेतल्या पात्रांवर कलम करून, त्यांच्या तोंडून, त्यांच्या भिन्न दृष्टिकोनांतून जीवनासंदर्भातल्या मूलभूत प्रश्नांवर विविध कोनांतून प्रकाश टाकण्याचं लेखक जयंत पवार यांनी कौशल्य दाखवलं आहे; जे लाजवाब आहे. या कथेचा रहस्यकथाकार निवेदक म्हणजे एकेकाळचा मराठीतला लोकप्रिय गुन्हेगारी कथाकार श्रीकांत सिनकर होय, हे वाचकाला कळतं. अरुण म्हणजे अरुण काळे आणि भुजंग म्हणजे भुजंग मेश्राम हे विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात दमदार कविता लिहून अकाली मृत्यू पावलेले कवी. कथेत, हातातल्या कवितेच्या वह्यांसकट धावत्या रेल्वेतून स्वतःला झोकून देऊन अस्तित्वाची दुखरी नस संपवून टाकणारा राजापुरे म्हणजे नव्वदच्या दशकात रेल्वेखालची अपघात की आत्महत्या अशी स्वतःच्या मृत्यूची मीमांसा संदिग्ध ठेवून लहान वयातच मरण पावलेला विवेक मोहन राजापुरे. आणि नशेच्या तारेत संज्ञाप्रवाही विचार प्रकट करत समुद्राच्या पाण्यात नाहिसा होणारा मन्या म्हणजे साठोत्तरी पिढीतला मनस्वी कलंदरपणे स्वतःचं आयुष्य उधळून टाकलेला कवी मनोहर ओक.  

मानवी अस्तित्व आणि दुःख यांचं नातं काय आहे, हा सनातन प्रश्न या कथेच्या मुळाशी आहे. कथेतले कवी सातत्याने या प्रश्नाविषयी बोलताहेत. रहस्यकथाकार असलेल्या निवेदकासाठी अर्थातच हा प्रश्न फारसा आस्थेचा नाही. आधी झुमरू बारमध्ये, नंतर ब्लू विंटरमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी वावरणाऱ्या बारबालेचं खरं नाव काय? तिची आयडेंटीटी काय? तिचं रक्षण करणारा बबलू तिचा नक्की कोण? आणि शेवटी तिचा खून कोणी केला? हे प्रश्न या रहस्यकथाकार असलेल्या निवेदकासाठी महत्त्वाचे असणं स्वाभाविक आहे. या प्रश्नांचा तो पाठपुरावा करतो. भुजंग, अरुण हे त्याचे कविमित्र जीवनातल्या गंभीर प्रश्नांवर कविता लिहिणारे, चर्चा करणारे, या रहस्यकथाकाराला तापदायक वाटत असले, तरी मित्र म्हणून बारमध्ये रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्यासोबत भटकताना तो त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या गुंताळ्यात गुरफटला जातो.  

भुजंग आणि अरुण हेही दोघे त्याच बारबालेच्या रहस्याचा शोध घेत आहेत. पण दोघांचे उद्देश पुन्हा वेगळे आहेत. गावाकडून मुंबईत पळून आलेल्या एका प्रिय मुलीच्या शोधात अरुण आहे. तीच ही बारबाला असावी असं त्याला वाटतं. आणि आदिम जाणिवेच्या कविता लिहिणारा भुजंग तिच्याकडे स्वतःतल्या आदिम प्रेरणांचं भक्ष्य म्हणून पाहतो. ती बारमध्ये नाचणारी मुलगी या सर्वांसाठीच एक रहस्य बनलेली आहे. या कथेत मानवी जीवनातल्या अनाकलनीयतेचं ती प्रतीक आहे. सबंध कथेत ती दिसत, वावरत राहते. परंतु तिचं बोलणं, व्यक्त होणं याला लेखकाने कथेत कुठंही जागा दिलेली नाही. तिला संदिग्ध ठेवलं आहे. भोवतीची पात्रं तिच्या आयडेंटिटीची चाचपणी करताना, तिच्या खरेपणाचा शोध घेताना केवळ दिसतात.

आपल्याला वाचक म्हणून हे माहीत आहे की भुजंग मेश्राम आणि अरुण काळे हे दोघे मराठी साहित्याच्या वंचित-विद्रोही परंपरेतले कवी होते. जयंत पवार यांनी त्यांच्या कवितांमधल्या जाणिवांचा, जीवनदृष्टीचा अतिशय कलात्मक उपयोग छटाकभर रात्र... या कथेत अस्तित्व आणि दुःख याविषयीच्या डिस्कोर्समध्ये करून घेतला आहे. विशेषतः शोषणाविषयीची त्यांची चर्चा या संदर्भात वाचण्यासारखी आहे. रहस्यकथाकार निवेदकाचा मित्र अरुण बारबालेच्या शोषित जीवनाकडे बुद्धाच्या करुणामयी नजरेने पाहतो. भुजंगच्या मते मात्र ती बारबाला बडे बाप का बेटा असलेल्या विराट ढोलकियाची गुलामी करताना त्या ढोलकियालाही वापरून घेते. एकप्रकारे ती आपल्या शोषकाचं शोषण केल्याचं समाधान मिळवते. शोषिताने शोषकाला असं वापरून घेणं, काही काळासाठी का होईना शोषक बनणं हा त्याच्यासाठी प्रतिरोधाचा एक मार्ग असतो, असं भुजंग म्हणतो. या पात्रांच्या द्वारे जयंत पवार यांनी साठोत्तरी मराठी साहित्यात आढळणाऱ्या जीवनदृष्टीचे विविध पदर या कथेत एकत्र आणून परस्परांसमोर उभे केले आहेत. 

दुःखामुळे अस्तित्वाची जाणीव अधिक ठसठसते की अस्तित्वाच्या जाणिवेमुळे दुःखाचा छळ सोसावा लागतो, आणि याचा साहित्यनिर्मितीशी काय संबंध असतो – हा प्रश्न या कथेत सर्वत्र भरून राहिला आहे. राजापुरे म्हणतो, अस्तित्वाला दुःखाची नाळ जोडलेली आहे..तीच तोडून टाकलेली बरी. आणि असं म्हणून तो धावत्या रेल्वेखाली काळोखात झेपावतो. मन्या सार्वत्रिक सत्य सांगितल्याच्या थाटात, तुम्ही आम्ही आपण सर्व विश्वाच्या विक्राळ पसाऱ्यासमोर अतिक्षुद्र आहोत, त्यामुळे असल्या प्रश्नांची उत्तरं शोधणंच मूर्खपणाचं आहे. भुजंग अत्यंत बेफिकीरपणे जगून स्वतःचं शरीर तोळामासा करतो. एका बेसावध क्षणी निवेदकाला अज्ञात अशा रहस्यमय रीतीने भुजंग आणि अरुण दोघंही मरतात. त्यांचाही खून झालाय की मृत्यू हे निवेदकाला अनाकलनीय राहतं.

“या शहरातून कवीच कसे एकेक करून नाहिसे होत चाललेत?” असा प्रश्न कथेच्या अखेरीस रहस्यकथाकाराला पडतो. इथं कवी हे समाजाच्या संवेदनशीलतेचं, समाजातल्या जागरूक जागल्यांचं प्रतिक म्हणून अधोरेखित झाले आहेत. ही संवेदनशीलता, जीवनभान हे जीवनाविषयीच्या अनाकलनीय प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक आहेत, असं या कथेच्या लेखकाला सुचवायचं आहे. म्हणजे एकीकडे जीवनाविषयीच्या अनाकलनीय प्रश्नांची उत्तरं शोधणं अवघड होत चाललंय, आणि दुसरीकडं त्यांचा शोध घेऊ शकणारी समाजाची संवेदनशक्तीच हरवून जात आहे, या भीतीदायक वस्तुस्थितीकडे त्याने लक्ष वेधलं आहे.

 

      इथं एक गोष्ट स्पष्ट होते : मानवी जीवनात सत्य शोधणं अशक्य होऊन बसलं आहे, सत्याचा शोध अखेर संदिग्धतेच्या प्रदेशात दिशाहीन अवस्थेत संपतो, असा आशय व्यक्त करून छटाकभर रात्र...चा लेखक थांबलेला नाही. तर पुढं जाऊन असं का होतं आहे, याचा शोध त्याने घेतला आहे. कथेतल्या एका वस्तुस्थितीकडे त्याने निर्देश केला आहे : कवींचं नाहिसं होणं. 

रहस्यकथाकार कथा कशासाठी लिहितो? वाचकांचं मनोरंजन करण्यासाठी. त्यांना रहस्याचा भेद झाल्याचा आनंद देण्यासाठी. पण या कथेतल्या रहस्यकथाकार निवेदकाला रहस्याचा भेद तर करता येत नाहीच; पण त्याला न झेपणारे प्रश्न त्याच्यावर एकामागून एक येऊन आदळू लागतात. राजापुरेने रेल्वेतून उडी मारली, मन्या समुद्र चिरत नाहीसा झाला आणि अखेरीस भुजंग आणि अरुण यांचाही मृत्यू झाला; या प्रकाराने भयंकर अस्वस्थ होऊन तो म्हणतो, “कशासाठी दोघं भांडले? कशाच्या मागे लागले? कशासाठी लिहीत राहिले? शब्दांचा जन्म देत राहिले? प्रत्येकजण एकेक रहस्य शोधत असतो की काय? आणि नष्ट होतो?” जयंत पवार इथं दाखवतायत की या कवींसारखे लोक आपलं आयुष्य पणाला लावून, उधळून टाकून आपल्या लिखाणावाटे अस्तित्वाविषयीच्या, सामाजिक शोषणाविषयीच्या असाध्य व्याधींची मूळं खणून काढण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या व्यवस्थेमुळे अशा कवींचाच बळी जाणार असेल, आणि आपण त्यांच्या नाहिसं होण्याविषयी जराही आस्था, चिंता दाखवणार नसू, तर आपल्याला जीवनाविषयीचं कुठलं सत्य गवसणार आहे? जीवनाविषयीच्या कुठल्याही प्रश्नाचं रहस्य उलगडणं आपल्याला अशक्य होऊन बसेल. कवींचं नाहीसं होणं म्हणजे समाज स्वतःची संवेदनशीलता हरवून बसणं.

      कथा संपताना जाणवतं की जयंत पवारांनी वाचकांना (म्हणजे आपल्याला) या रहस्यकथेच्या निवेदकाच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. निवेदकाला कथेतलं वास्तव अनाकलनीय, झेपेनासं झालं आहे, तशीच एकंदर जीवनाविषयी आज आपली अवस्था आहे. रहस्यकथेच्या रूढ, लोकप्रिय आकृतिबंधाला झेपत नाहीत, असे प्रश्न लेखकाने या रहस्यकथेत हेतुपूर्वक उपस्थित केले आहेत. त्यातून लेखकाला सुचवायचं आहे की आपली अवस्था या कथेसारखी उथळ बधीर झाली आहे. कथेचा घाटसुद्धा आशय व्यक्त करतो, लेखकाचं जीवनभान व्यक्त करतो, ते अशाप्रकारे.

आणि हे करत असताना लेखक आपल्याला आपण काय गमावून बसतो आहोत, तेही दाखवतो आहे. मनोहर ओक, विवेक मोहन राजापुरे यांची अस्तित्वाचा तळ शोधू पाहणारी आधुनिकवादी चिंतनशीलता, भुजंगच्या कवितेतला विद्रोह, अरुण काळेच्या कवितेतली बुद्धाची करूणामय दृष्टी यांचं जसं मराठी साहित्यातून विघटन होतं आहे, तसंच समाजमनातूनही ही दृष्टी, विचार, प्रेरणा नाहीशा होत आहेत. एका अर्थाने या कथेने साठच्या दशकापासून निर्माण झालेल्या मराठी साहित्याची समीक्षा केली आहे, तर दुसरीकडे आपल्या समाजाचा चिकित्सक वैचारिक वारसा कोणता याचं निदान केलं आहे, आणि तो गमावत असल्याबद्दलची चिंता अत्यंत कलात्मक परिमाणांद्वारे व्यक्त केली आहे. अशी थोर कथा क्वचितच लिहिली जाते आणि कायमची लक्षात राहते.

(रोहन साहित्य मैफल’ या रोहन प्रकाशनाच्या गृहपत्रिकेने 'गेल्या वीस वर्षांतल्या मला सर्वाधिक आवडलेल्या कथे'विषयी लिहायला सांगितलं. त्यासाठी लिहिलेला हा लेख 'रोहन साहित्य मैफली'च्या नोव्हेंबर २०२० च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.) 

Saturday 14 August 2021

सतीश काळसेकर : कवी काय काय काम करतो....

 ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं २४ जुलै रोजी अचानक निधन झालं. वयोमानानुसार येणारी आजारपणं असली तरी ते इतक्या झटपट आपल्यातून निघून जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं. गेली सुमारे सहा दशकं सतीश काळसेकर केवळ साहित्यात नव्हे, तर महाराष्ट्राच्या एकंदर सामाजिक-सांस्कृतिक अवकाशात किती महत्त्वाची भूमिका निभावत होते, याची प्रचिती, काळसेकर गेल्यानंतर समाजमाध्यमांवर त्यांच्याप्रति वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या अनेक लोकांकडून जी आदरांजली वाहण्यात आली, त्यांच्या आठवणी जागवण्यात आल्या, त्यावरून दिसून येते.

सतीश काळसेकर यांच्या अनेक ओळखी होत्या लघुनियतकालिक चळवळीतले कवी-कार्यकर्ते, पुस्तकवेडे आणि पर्यटनवेडे, साहित्याचे भाष्यकार,नव्या लेखक-कवींचं साहित्य शोधून प्रसिद्ध करणारे प्रकाशक, ट्रेड युनियनचे नेतेसंपादक इत्यादी. कवी काय काम करतो अशा मथळ्याचा दिलीप चित्र्यांचा लेख, कवीच्या कवितालेखनाविषयी आहे. पण एक कविता लेखन सोडून एखादा कवी काय काय करू शकतो याचं सतीश काळसेकर हे एक जितंजागतं उदाहरण होतं. आयुष्य रसरसून कसं जगावं हे या कॉम्रेडकडून शिकण्यासारखं होतंच, पण त्याशिवाय लेखनाव्यतिरिक्त अंगावर पडलेल्या इतर जबाबदाऱ्यांच्या निमित्ताने व्यवस्थेत शक्य तिथं हस्तक्षेप करत, तिला आपल्या भूमिकेला सुसंगत असं वळण देण्याचा प्रयत्न अथकपणे करणं – हे काळसेकरांचं खास वैशिष्ट्य होतं. त्यामुळं लघुनियतकालिकांची चळवळ संपली, तरी काळसेकरांच्या आयुष्यातली चळवळ संपली नव्हती. किंबहुना, काळसेकरांचं आयुष्य हीच एक चळवळ होती. प्रगतिशील लेखक संघ, लोकवाङ्मय गृह, महाराष्ट्र फाउण्डेशन इत्यादी संस्थांमधलं काळसेकरांचं काम पाहिलं तर ही बाब प्रकर्षाने ध्यानात येते.

 

सतीश काळसेकरांची सर्वात ठळक ओळख लघुनियतकालिक चळवळीशी निगडीत आहे. त्यांचा लघुनियतकालिक चळवळीशी संबंध १९६४च्या सुमारास, वयाच्या २१व्या वर्षी आला. तेव्हा काळसेकर भवन्स कॉलेजमध्ये शिकत होते. ताडदेवचं समाजवादी विचारांचं जनता केंद्र आणि दादरचं कम्युनिस्ट विचारांचं जागृती मंडळ या दोन संस्थांमध्ये प्रारंभीच्या काळात काळसेकरांची वैचारिक जडणघडण झाली. जागृती मंडळात तारा रेड्डी, जी. एल्. रेड्डी यांच्या भोवती गोळा झालेले शशि प्रधान, नंदा प्रधानश्याम मोकाशीअरुण खोपकर, प्रदीप वर्मा, पुष्पा त्रिलोकेकर यांच्यासारखे तरुण नवं काहीतरी करण्याची उमेद बाळगून होते. भारूड हे द्वैमासिक जागृती मंडळातर्फे १९६४-६५मध्ये चालवलं जायचं. या मासिकाच्या १९६५मधल्या कथास्पर्धेत सतीश काळसेकरांनी लिहिलेल्या कथेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्यापूर्वी त्यांचं लेखन नवाकाळ’, ‘मराठा या पत्रांमध्ये छापून येत होतं.

१९५९मध्ये कोकणातल्या मालवणजवळच्या काळसे या छोट्याशा गावातून मुंबईत महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेल्या या मुलाला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं. पण आर्थिक ओढगस्तीमुळे हे महागडं शिक्षण घेणं आपल्याला शक्य होणार नाही, हे त्याच्या लवकरच ध्यानात आलं, आणि त्याने भवन्स कॉलेजमध्ये कलाशाखेत प्रवेश घेतला. जयवंत दळवी यांचे काका वि. वि. दळवी हे इथं उपप्राचार्य होते. माझे रामायणकर्ते दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांचा मुलगा वैनतेय तुळजापूरकर हे त्यांना इंग्रजी शिकवत असत. काळसेकर भवन्समध्ये शिकत असतानाच त्यांची मैत्री सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वसंत गुर्जर आणि राजा ढाले यांच्याशी झाली.

मुंबईत लघुनियतकालिकांची चळवळ १९६०पासूनच सुरू झाली होती. अशोक शहाणे यांनी त्यांच्या मित्रांसह संपादित केलेल्या शब्द आणि अथर्वचे अंक, ‘साप्ताहिक मनोहरमधला मराठी साहित्यावर क्ष किरण टाकणारा प्रक्षोभक लेख यांनी मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली होती. या साऱ्याचा प्रभाव सतीश काळसेकर, राजा ढाले, वसंत गुर्जर अशा तरुणांवर पडला, आणि १९६४पासून लघुनियतकालिकांची चळवळ अधिक विस्तारली.   

१९६४च्या सुमारास मुंबईत लघुनियतकालिक चळवळीची दुसरी लाट आली. आत्ता’, ‘भारूड’, ‘हेमा ही लघुनियतकालिकं १९६४मध्ये निघाली. १९६७ ते ७० या काळात फक्त’, ‘चक्रवर्ती’, ‘तापसी’ ही लघुनियतकालिकं निघाली. सतीश काळसेकरांसह राजा ढाले, अरुण खोपकर, वसंत गुर्जर, तुळसी परब,चंद्रकांत खोत, नामदेव ढसाळ, नारायण बांदेकर या लेखकांचा यात समावेश होता.

लघुनियतकालिकांच्या या दुसऱ्या लाटेची दोन वैशिष्ट्यं सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य – त्या काळात काळसेकर आणि त्यांच्या मित्रांवर ज्या मार्क्सवादी, आंबेडकरवादी (दलित) जाणिवांचे संस्कार होत होते, त्या जाणिवा लघुनियतकालिकाच्या या दुसऱ्या लाटेतून व्यक्त होऊ लागल्या. त्यामुळे लघुनियतकालिक चळवळीचं बंड हे केवळ वाङ्मयीन परिघात मर्यादित न राहता, तिला राजकीय-सामाजिक आयाम मिळाला. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांच्या आवाजांना त्यात प्रतिनिधित्व मिळू लागल्याने या चळवळीचा अधिक विस्तार झाला. पुढे मागोवासारखी निखळ राजकीय विचार मांडणारी लघुनियतकालिकं यातून सुरू झाली.

दुसरं वैशिष्ट्य – लघुनियतकालिकांची चळवळ ही जगभर प्रामुख्याने महानगरी-शहरी चळवळ राहिली. परंतु १९६५नंतर महाराष्ट्रात औरंगाबाद, अमरावती,पुणे अशा त्या काळातल्या निमशहरांमधूनही लघुनियतकालिकं प्रसिद्ध होऊ लागली. यामुळं या चळवळीचं विकेंद्रीकरण झालं. भौगोलिकदृष्ट्या महानगराबाहेरच्या निमशहरी-ग्रामीण भागातल्या लिहित्या लेखकांना व्यक्त होण्याचं माध्यम उपलब्ध झालं.

लघुनियतकालिकांच्या या विस्तारशील काळात सतीश काळसेकर हे या चळवळीतलं महत्त्वाचं नाव होतं. काळसेकरांची या चळवळीतली भूमिका समन्वयाची, संवादाची होती. ते विचाराने डावे होते, आणि त्या विचाराच्या दृष्टीतून साहित्याविषयीची भूमिका लिखाणामधून ठामपणे मांडत होते, हे तर खरंच. परंतु त्याचबरोबर लघुनियतकालिक चळवळी-अंतर्गत या काळात वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये जो संघर्ष निर्माण झाला, त्यात त्यांनी संवादाची भूमिका घेतली. प्रस्थापित व्यवस्थेला विरोध हेच या चळवळीतल्या वेगवेगळ्या प्रवाहांचं अंतिम उद्दिष्ट होतं. त्या दृष्टीने त्यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न काळसेकरांनी केला. १९६८ आणि १९६९ या वर्षांत प्रसिद्ध झालेल्या अनुक्रमे तापसी (काळसेकरांनी संपादित केलेला केवळ एकच अंक प्रसिद्ध झाला) आणि ‘चक्रवर्ती (राजा ढाले यांच्यासह संपादन) या लघुनियतकालिकांमध्ये काळसेकरांची ही भूमिका दिसून येते.

पण असा समन्वय साधण्याचीसंवादी भूमिका काळसेकर घेत असले, तरी त्यात त्यांच्या वैचारिक भूमिकेशी कोणतीही तडजोड नव्हती. डाव्या विचाराची दृष्टी बाळगून त्यांनी सातत्याने साहित्यव्यवहारात हस्तक्षेप केला. त्यामुळे त्यांना संवाद किंवा समन्वय साधायचा होता, तो परिवर्तनवादी विचारांच्या विविध प्रवाहांमध्येच. या प्रवाहांबाहेरचे, पुनरुज्जीवनवादी किंवा प्रस्थापित अशा व्यवस्थांशी काळसेकरांनी कधीही हातमिळवणी केली नाही. म्हणूनच कोणतंही काम करताना ते एक कार्यकर्ता म्हणून, चळवळीसारखंच त्यांनी केलं. त्यांची बांधिलकी कायम परीघावरच्या संस्थांशी, व्यक्तींशी राहिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक प्रस्थापित संस्थान बनून राहिल्यानंतर काळसेकर त्याला पर्यायी म्हणून महाराष्ट्रात वेळोवेळी उभ्या राहिलेल्या, पर्यायी साहित्य संमेलन,सकल साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन अशा उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले. प्रगतिशील लेखक संघ हिंदीमध्ये अतिशय प्रभावी कार्य करत होता. महाराष्ट्रात प्रगतिशील लेखक संघाचं काम शहराबाहेर ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी, नवनवे लेखक त्याला जोडून घेण्यासाठी काळसेकरांची शोधक दृष्टी सातत्याने जागृत राहिली. 

अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउण्डेशन या संस्थेने मराठी साहित्य पुरस्कार सुरू केल्यानंतर अल्पावधीतच या पुरस्कारांनी महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेचं स्थान मिळवलं. पुरोगामी विचारांची व्यापक चौकट स्वीकारून ही पुरस्कार योजना सुरू झाली होती. या पुरस्कार समितीचे निमंत्रक म्हणून सतीश काळसेकर यांनी २००३पासून पुढं काही वर्षं काम पाहिलं. मराठीतले महादेव मोरेंसारखे मौलिक लेखन करूनही दुर्लक्षित राहिलेले लेखक या पुरस्कारासाठी विचारात घेतले जावेत,यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अजीम नवाज राही याच्यासारख्या ग्रामीण भागातल्या कवीच्या कवितांना पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस केली. परिणामी मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेरच्या अनेक लेखकांना महाराष्ट्र फाउण्डेशनचा सन्मान मिळू शकला. काळसेकरांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र फाउण्डेशनने मराठीतल्या नियत-अनियतकालिकांसाठी पुरस्कार सुरू केले होते. ही कल्पना सतीश काळसेकरांचीच. ध्येयाने पछाडलेल्या तरुणांनी चालवलेल्या छोट्या नियतकालिकांना पुरस्कार देऊन त्यांचं कार्य आणि महत्त्व समाजाच्या नजरेस आणून देण्याचा तो प्रयत्न होता.

      नारायण सुर्वे, सदा कऱ्हाडे, सुधाकर बोरकर यांच्यासोबत सतीश काळसेकरांनी देखील लोकवाङ्मय गृहाचं काम पाहायला सुरुवात केली. आज मागं वळून पाहताना या संस्थेमध्ये काळसेकरांनी उमटवलेला कामाचा ठसा स्पष्ट दिसतो. सुरुवातीला काळसेकरांनी पीपल्स बुक हाऊस या फोर्ट परिसरातल्या पुस्तकांच्या दुकानाच्या उभारणीत लक्ष घातलं. काळसेकरांचं ग्रंथप्रेम आणि चौफेर वाचन इथं उपयोगी पडलं. मराठीसोबतच इंग्रजी आणि मुख्यतः हिंदी भाषेतली निवडक पुस्तकं वेचून ती इथं विक्रीसाठी ठेवली जाऊ लागली. त्यातून, इतर पुस्तक-दुकानांमधल्या लोकप्रिय साहित्याच्या गर्दीत स्थान मिळणं शक्य नव्हतं, असे अनेक परिवर्तनवादी-डाव्या विचारांची पुस्तकं मुंबईकर वाचकांना सहजपणे उपलब्ध होऊ लागली. छोटे छोटे प्रकाशक शोधून, मुंबई विद्यापीठ, मराठी संशोधन मंडळ,विदर्भ संशोधन मंडळ यांसारख्या संस्थांनी प्रसिद्ध केलेली आणि विक्रीविना पडून राहिलेली पुस्तकं धुंडाळून – प्रसंगी अशा पुस्तकांचे गठ्ठे स्वतः खांद्यावर वाहून – त्यांनी पीपल्स बुक हाऊस हे हट-के पुस्तकांचं केंद्र बनवलं. इथं चोखंदळ वाचकाला आणि नव्याच्या शोधात असलेल्या वाचकाला हवं ते मिळत असे. मुंबई विद्यापीठाच्या गोदामातले जवळजवळ लगदा झालेले र. पं. कंगले भाषांतरित कौटिलीय अर्थशास्त्राचे खंड त्यांनी स्वतः स्वच्छ करून, ठीकठाक करून वाचकांना उपलब्ध करून दिले; गौरी देशपांड्यांनी भाषांतरित केलेले अरेबियन नाईट्सचे खंडधर्मानंद कोसंबी यांचं निवेदन हे आत्मकथन, अ. का. प्रियोळकर गौरव ग्रंथ अशा वाचकांना फारशा माहीत नसलेल्या कितीतरी पुस्तकांच्या शोध घेऊन ती त्यांनी पीपल्स बुक हाऊसमध्ये विक्रीसाठी ठेवली. हिंदीमध्ये साहित्य-संस्कृतीविषयीची अनेक नियतकालिकं निघतात. पैकी बहुतेक महत्त्वाची नियतकालिकं हमखास मिळणारं मुंबईतलं एकमेव केंद्र म्हणजे पीपल्स बुक हाऊस, हे आजही वाचकांना ठाऊक आहे. ही नियतकालिकं मागवून ती विक्रीसाठी ठेवण्याचा उपक्रम काळसेकरांनीच सुरू केला. या छोट्याशा दुकानाच्या मोकळ्या जागेत संध्याकाळी छोटे वाङ्मयीन चर्चांचे, कवितावाचनाचे, पुस्तकप्रकाशनाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. आज दक्षिण मुंबईतल्या इंग्रजी पुस्तक दुकानांत असे कार्यक्रम नेहमीच होत असतात. पण पीपल्स बुक हाऊस या मराठी पुस्तकांच्या दुकानात काळसेकरांनी हे तीस वर्षांपूर्वी केलं.

      वीस वर्षांपूर्वी काळसेकरांनी लोकवाङ्मय गृहाचं संपादकीय काम पाहायला सुरुवात केली. वाङ्मयवृत्त ही मासिक पत्रिका लोकवाङ्मय गृहाचं हाऊस जर्नल आहे. या आठ पानांच्या मासिकाचं स्वरूप काळसेकरांनी असं काही पालटून टाकलं की तेवढ्या लहानशा जागेत छापलेल्या मजकुराने वाचकांचं समाधान होईना; वाचकांच्या आग्रहावरून मासिकाची पृष्ठसंख्या वाढवावी लागण्याचं अलीकडच्या काळातलं हे एकमेव उदाहरण असावं. प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांनी वाङ्मयवृत्तच्या पानांची संख्या आठवरून सोळा केली, आणि मजकूर अधिक असल्यास त्याहूनही अधिक पानं या मासिकात छापली जाऊ लागली. २००२ पासून पुढची चौदा-पंधरा वर्षं महाराष्ट्रातले चोखंदळ वाचक, लेखक आणि नव्याने लिहू-वाचू लागलेले ग्रामीण-अर्धनागर भागातले लोक अशा दोन्ही प्रकारच्या वर्गांत वाङ्मयवृत्तने विलक्षण लोकप्रियता मिळवली होती, याचा अनुभव या मासिकात लिहिणाऱ्या लेखकांनीही घेतला आहे. मराठीतल्या पहिल्या फळीतल्या दैनिकांच्या पुरवण्यांत लिहिल्यानंतरही जेवढ्या प्रतिक्रिया आल्या नसतील, तेवढ्या प्रतिक्रिया, फोन वाङ्मयवृत्तमध्ये लेख प्रसिद्ध झाल्यानंतर येतात, असा अनुभव या मासिकात लिहिणाऱ्या अनेक लेखकांनी घेतला आहे. ही सतीश काळसेकर यांच्या संपादकनकौशल्याला मिळालेली दाद आहे. स्वतः काळसेकरांनी वाङ्मयवृत्तमध्ये दरमहा वाचणाऱ्याची रोजनिशी हे सदर नियमितपणे लिहिलं. काळसेकरांचं ग्रंथप्रेम सर्वज्ञात आहे. त्यांच्यासारख्या जाणकार आणि चौफेर वाचकाला मराठी-हिंदी-इंग्रजी भाषेतली भावलेली नवनवी पुस्तकं, त्यांच्या निमित्ताने आधीच्या पुस्तकांच्या, लेखकांच्या जागवलेल्या आठवणी, स्वतःच्या पुस्तकप्रवासातल्या पुस्तकं मिळवण्याच्यात्यांचं जतन करण्याच्या गोष्टी, क्वचित चित्रपट, संगीत इत्यादी कलांमधले नेमके संदर्भ – यांनी ही रोजनिशी गजबजलेली असे. महाराष्ट्रभराच्या कानाकोपऱ्यातले तरुण पिढीतले वाचक या रोजनिशीची आतुरतेने वाट पाहात आणि तिची वाट पुसत स्वतःचं वाचन वाढवत,अशा आठवणी काळसेकरांच्या निधनानंतर कित्येकांनी समाजमाध्यमांवर सांगितल्या आहेत. या रोजनिशीचं ग्रंथरूप पुढं लोकवाङ्मय गृहाने प्रसिद्ध केलं आणि त्याला साहित्य अकादेमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळाला हा नंतरचा इतिहास आहे.

      लोकवाङ्मय गृहाने २००१पासून प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांच्या यादीवरून नजर फिरवली तर या संस्थेने किती वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लेखकांचं वैविध्यपूर्ण साहित्य वाचकांसमोर ठेवलं हे ध्यानात येईल. यामागे सतीश काळसेकर, प्रकाश विश्वासराव यांची दृष्टी होती. गोविंद पानसरे यांचा या दोघांवरही विश्वास होता आणि त्यामुळेच अल्पावधीतच भाकपची सांस्कृतिक शाखा असलेल्या लोकवाङ्मय गृहाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अव्वल आणि सर्वोच्च स्थान प्रस्थापित केलं होतं. भालचंद्र नेमाडे, गो. मा. पवार, अशोक केळकर, वसंत पळशीकर, मे. पुं. रेगे, राम बापट, रंगनाथ पठारे, दिलीप चित्रे, दि. के. बेडेकर, भाऊ पाध्ये, राजा ढाले, अशोक शहाणे, वसंत आबाजी डहाके, भालचंद्र मुणगेकर, नीरज हातेकर, सुधीर पानसे, दिनानाथ मनोहर, अरुण काळे, भुजंग मेश्राम – असे विविध प्रवाहातले बहुतेक सगळे महत्त्वाचे लेखक लोकवाङ्मय गृहाशी या काळात जोडले गेले.

      महाराष्ट्र फाउण्डेशन, प्रगतिशील लेखक संघ आणि इतर निमित्ताने सतीश काळसेकरांची महाराष्ट्रभर भटकंती सुरूच असायची आणि अशा प्रत्येक फेरीत त्या त्या प्रदेशातले नवे चांगले लिहिणारे लेखक कोण आहेत, याचा शोध त्यांची शोधक दृष्टी घ्यायची. त्यामुळेच कोकणातल्या प्रवीण बांदेकर, वीरधवल परब,अजय कांडर यांच्यापासून विदर्भातल्या रामराव झुंजारे, अशोक पवार यांच्यापर्यंत अनेक नव्या लेखक-कवींचं साहित्य लोकवाङ्मय गृहासाठी काळसेकरांनी मिळवलं. अनेकांना त्यांनी लिहितं केलं; अनेकांच्या लेखनाचं मोल जाणून ते रचनेत कच्चं वाटलं तर त्याला वेळ देऊन ते वारंवार पुनर्लिखित करण्यासाठी लेखकांचा पाठपुरावा करून त्यांनी ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केलंच.

      सतीश काळसेकरांच्यामधला कॉम्रेड हा अखेरपर्यंत काम करत होता. परिवर्तनवादी विचारांनी भारलेल्या अनेक प्रवाहांशी, अनेक पिढ्यांशी अखेरपर्यंत त्यांचा संवाद कायम राहिला. म्हणूनच गेल्या पन्नास वर्षांतल्या महाराष्ट्राच्या वाङ्मयीन संस्कृतीवर ज्यांनी आपला ठसा उमटवला, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये सतीश काळसेकरांची गणना करावी लागेल. काळसेकरांच्या लेखनापेक्षाही त्यांनी केलेल्या वरील कार्याचं मोल त्या दृष्टीने मोठं आहे. याची प्रचिती येणाऱ्या काळात हळूहळू, पण प्रकर्षाने येईल अशी सध्या भोवतालची परिस्थिती आहे.

                                                                                                                    (साप्ताहिक युगांतर, ५ ते ११ ऑगस्ट २०२१)

-----

Thursday 13 May 2021

मराठी कवितेतली क्रांती, जर्मन तंत्रज्ञान आणि आपलं इतिहास-भान


मराठी कवितेत केशवसुतांनी पहिली क्रांती घडवून आणली खरी, पण या क्रांतीला जर्मन तंत्रज्ञानाचाही मोठा हातभार लागला होता. कवितेत,साहित्यात होणाऱ्या क्रांतीचा तंत्रज्ञानाशीही संबंध असतो. वाङ्मयीन संस्कृतीच्या इतिहासात तंत्रज्ञानाचा असलेला वाटाही लक्षात घ्यावा लागतो. आज ही गोष्ट प्रकर्षाने जाणवण्याचं कारण म्हणजे जुनी वर्तमानपत्रं चाळताना अचानक हाती आलेली दै. दिव्य मराठीच्या १६ फेब्रुवारी २०२०च्या अंकातली जळगावातला १३५ वर्षं जुना छापखाना बंद होणार असल्याची एक बातमी. ज्या काळात मुंबई-पुण्याबाहेर महाराष्ट्रात अन्यत्र कुठल्या शहरात छापखाने जवळजवळ नव्हते, त्या काळात, १८८०मध्ये नारायण नरसिंह फडणीस (मराठी साहित्यात ज्यांची नाना फडणीस म्हणून नोंद आहे -) यांनी जळगावात नवा छापखाना सुरू करण्याचं स्वप्नं पाहिलं. त्यासाठी जर्मनी, लंडन येथून यंत्रसामुग्री मागवली. स्टीम छपाई यंत्र जर्मनीहून आणलं आणि जळगावमध्ये बाबजी स्टीम प्रिंटिंग प्रेस’ सुरू केला. या प्रेसमधूनच १८८७पासून पुढं काव्यरत्नावलि हे केवळ कवितेला वाहिलेलं मासिक बाहेर पडलं. नाना फडणीसांनी खपाची, आर्थिक नुकसानीची तमा न बाळगता या मासिकातून मराठीत नव्याने लिहिल्या जाऊ लागलेल्या रोमँटिक कवितांचा प्रसार सातत्याने अर्धशतकभर केला. मराठीत रोमँटिक कवितेचा प्रवाह रुजवून क्रांती घडवण्याचं श्रेय केशवसुतांच्या कवितेला जसं आहे, तसंच ही कविता वाचकांपर्यंत निष्ठेने पोहोचवणाऱ्या काव्यरत्नावलिलाही दिलं पाहिजे.   





पद्यपंक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे असं म्हणत त्या तरफेच्या जोरावर जग उलथवून टाकण्याची आकांक्षा केशवसुतांनी मराठी कवितेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दाखवली. पण ही आकांक्षा काही आभाळातून अचानक टपकली नव्हती किंवा केशवसुतांनी जन्मतः आपल्या सोबत आणलेली नव्हती. केशवसुतांसारख्या साध्या शाळामास्तर असलेल्या कवीच्या मनात अशा दुर्दम्य आकांक्षेचे कोंभ फुटले ते सभोवतालच्या पर्यावरणात शतकभरापासून चालू असलेल्या उलथापालथींच्या परिणामांतून. नाना फडणीसांची आधुनिक प्रिंटिंग प्रेस सुरू करण्याची आकांक्षा आणि केशवसुतांची आधुनिक सामाजिक मूल्यं रुजवण्याची आकांक्षा यांचा उगम एकाच परिस्थितीतून झाला.

मराठी आधुनिक साहित्य – कविता, कादंबऱ्या – हे इंग्रज समाजाशी झालेल्या संस्कृति- संपर्कातून उदयाला आलेलं आहे असं म्हटलं जातं. या संस्कृति-संपर्काच्या प्रक्रियेतून केशवसुत, ह. ना. आपटे, रानडे इत्यादींनी जशी नवी सामाजिक मूल्यं, इहवादी दृष्टिकोन वगैरे आत्मसात केली, तशीच काही लोकांना नवं वैज्ञानिक तंत्रज्ञान खुणावू लागलं. भारतात रेल्वे आणण्याचं श्रेय इंग्रजांना असलं, तरी इंग्लंडमध्येही त्या काळात नव्यानेच सुरू झालेली रेल्वे वाहतूक आपल्याही देशात सुरू व्हावी यासाठी कंपनी स्थापन करण्याची धडपड, मदत मिळण्यासाठी इंग्रज सरकारकडे पाठपुरावा हे सर्व सर्वप्रथम नाना शंकरशेट आणि त्यांच्या समकालीन मुंबईकरांनी केलं होतं. इंग्रज कारागिरांच्या हाताखाली छपाईचे खिळे तयार करण्याचं आणि प्रत्यक्ष छपाईचं शिक्षण घेतल्यानंतर स्वतः छापखाने उभारून आपल्या मनाजोगती पुस्तकं प्रसिद्ध करण्याची स्वप्नं हाती भांडवलाचं पाठबळ नसताना गणपत कृष्णाजी पाटील, निर्णयसागरचे जावजी दादाजी चौधरी, राणूजी आरू यांनी पाहिलं आणि प्रत्यक्षात उतरवलंही. इतकंच नव्हे, तर निर्णयसागरने जगभरच्या इंडॉलॉजीस्टना संशोधनासाठी हवे असणारे संस्कृत ग्रंथ सुबक वळणदार देवनागरी टंकांमध्ये उपलब्ध करून दिले. एकप्रकारे भारतविद्येच्या जागतिक पातळीवरच्या अभ्यासाला हातभार लावला. या छापखान्यांमध्ये छापली जाणारी पुस्तकं आणि नियतकालिकं नव्या विचारांचे प्रसारक होते. पण हे नवे विचार गावोगावच्या वाचकांपर्यंत वाहून नेणारी भौतिक यंत्रणा आवश्यक होती. रेल्वे वाहतुकीचं दिवसेंदिवस विस्तारणारं जाळं आणि त्याच्या आधाराने इंग्रजांनी स्थापन केलेली टपाल यंत्रणा यामुळं ही मासिकं, त्यांतले नव-विचार वाचकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. 

या आजच्या चिंतनाचं निमित्त आहे जळगावची बाबजी प्रिंटिंग प्रेस. बातमीत म्हटलंय की गेली १३५ वर्षं अव्याहतपणे सुरू असलेली ही प्रिंटिंग प्रेस आता बंद होणार आहे. नाना फडणीसांच्या वंशजांनी तसा निर्णय घेतला आहे. गणपत कृष्णाजी, निर्णयसागर हे छापखाने तर केव्हाच इतिहासजमा झाले. त्यांच्या अस्तित्वाची एखादी खूणही शिल्लक राहिली नाही. याची खंतही कुठं व्यक्त झाली नाही. या पार्श्वभूमीवर फडणीस कुटुंबाने घेतलेला एक निर्णय त्यांच्या जाणतेपणाचा द्योतक आहे. प्रेस बंद करताना, प्रेसमधलं पहिलं, नाना फडणीसांनी जर्मनीहून मागवलेलं स्टीम प्रिंटिंग मशीन त्यांच्या वारसांनी कुठल्यातरी वस्तुसंग्रहालयाला भेट द्यायचं ठरवलं आहे. बातमी एक वर्षापूर्वीची आहे. माझ्या नजरेला ती आत्ता पडली आहे. फडणीस कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं त्यांना शक्य झालं काय याची खातरजमा करणं आवश्यक आहे. परंतु या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूचं जतन करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय नक्कीच दखल घेण्याजोगा आहे. 

खरं म्हणजे बाबजी प्रिंटिंग प्रेसमधलं हे स्टीम मशीन मराठी साहित्याच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे एखाद्या विद्यापीठाच्या मराठी विभागाने, मोठ्या ग्रंथालयाने किंवा साहित्य महामंडळाने हे मशीन ताब्यात घेऊन त्याचं जतन करायला हवं. काव्यरत्नावलि याच मशीनवर छापलं जात होतं. केशवसुत आणि त्यांच्या संप्रदायातल्या कवींच्या कविता या मासिकातूनच सर्वाधिक प्रमाणात छापल्या गेल्या. जुन्या विचाराचे मराठी समीक्षक त्या काळात केशवसुत आणि त्यांच्या संप्रदायातल्या इतर कवींच्या कवितेवर टीका करत असताना, आणि आर्थिकदृष्ट्या आतबट्टयाचं ठरत असतानाही पन्नासेक वर्षं हे मासिक निष्ठेनं चालवणं म्हणजे साधी गोष्ट नव्हे. नाना फडणीस हे स्वतः कवितेचे उत्तम जाणकार होते आणि मराठी कवितेचा हा नवा आविष्कार त्यांना वाचकांसमोर सातत्याने येणं निकडीचं वाटत होतं. त्यामुळेच निष्ठापूर्वक काव्यरत्नावलिचं प्रकाशन ते करू शकले. या मासिकाच्या ऐतिहासिक कर्तृत्वाच्या काही ठळक नोंदी करता येतील – 

१)    १८८७ ते १९३५ एवढा दीर्घकाळ हे मासिक नियमितपणे प्रसिद्ध झालं.

२)     केशवसुतांची पहिली आणि अखेरची कविता काव्यरत्नावलीमध्ये प्रसिद्ध झाली. काव्यरत्नावलि ऑक्टोबर १८८८च्या अंकात जास्वंदीचीं मुलें व पारिजातकाचीं फुलें ही कविता कोणी एक कवी या टोपणनावाने छापून आली. ही केशवसुतांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. केशवसुतांनी लिहिलेली अखेरची कविता हरपलें श्रेय. ही काव्यरत्नावलीच्याच जून १९०५च्या अंकात प्रसिद्ध झाली. केशवसुत त्यांच्या हयातीत फारसे वाचले गेले नाहीत, दुर्लक्षित राहिले. महान कवी म्हणून त्यांची चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मृत्यूच्या एकदीड दशकानंतर. पण त्यांच्या हयातीत त्यांच्या कवितेला निष्ठेने साथ दिली ती नाना फडणीसांच्या काव्यरत्नावलिने. १८९७मध्ये खानदेशातल्या भडगाव इथं केशवसुत शिक्षक म्हणून गेल्यावर त्यांचा आणि नाना फडणीसांचा निकटचा संबंध आला. या कवीच्या कवितेतलं क्रांतिकारकत्व ओळखून त्यांच्या अनेक कविता फडणीसांनी इथून पुढं प्रसिद्ध केल्या.

३)    केशवसुत या नावासह केशवसुतांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता – प्रणयकथन ही  काव्यरत्नावलिच्या ऑगस्ट १८९८च्या अंकात आहे. काही लोक सतारीचे बोल ही मासिक मनोरंजनच्या फेब्रुवारी १९०० अंकात आलेली कविता केशवसुत या नावाने छापलेली पहिली कविता आहे असं मानतात, त्यापूर्वीची ही कविता. त्यामुळे केशवसुत हे नाव रूढ करण्याचं श्रेयही काव्यरत्नावलिचंच.  

४)     केशवसुतांपासून माधव ज्यूलियन यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांमधल्या (पहिली केशवसुतांची, दुसरी गोविंदाग्रजांची आणि तिसरी रविकिरण मंडळ व त्यांच्या समकालीन कवींची–) सर्व आघाडीच्या कवींचा काव्यरत्नावलीशी जवळचा संबंध राहिला. केशवसुत, रे. टिळक, विनायक, दत्त, बी, चंद्रशेखर, माधवानुज, अनंततनय, गोविंदाग्रज, बालकवी, दु. आ. तिवारी, रहाळकर, ना. के. बेहेरे, यशवंत, गिरीश, माधव ज्यूलियन, आनंदराव टेकाडे, देवदत्त टिळक, साने गुरुजी या वैविध्यपूर्ण प्रवृत्तींच्या कवींच्या कविता काव्यरत्नावलीतून प्रसिद्ध झाल्या.

५)     अलीकडील कविमंडळीनी चालविलेले कवितेचे मासिक पुस्तक हे बिरुद काव्यरत्नावलिच्या मुखपृष्ठावर छापलेलं असायचं. आपण समकालाचं, नव्या जाणिवांचं प्रतिनिधित्व करतो आहोत, याची नाना फडणीसांना पूर्ण जाणीव होती. त्या जबाबदारीच्या भावनेनेच त्यांनी काव्यरत्नावलि चालवलं आणि मराठीत रोमँटिक कवितेचा संप्रदाय रुजवला. इतर अनेक मासिके आधुनिक मराठी कवींची कविता आवर्जून प्रसिद्ध करीत. पण काव्यरत्नावलि हे आपले घरचे मासिक आहे असे कविमंडळीना वाटत असे. असं बा. द. सातोस्कर यांनी या मासिकाचा इतिहास लिहिताना म्हटलं आहे.

 

भांडवलाचा, तंत्रज्ञानाचा अभाव असताना आधुनिक तंत्रज्ञान उभारण्याचं आणि त्यातून मराठी साहित्याची सेवा करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या नाना फडणीस यांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून मराठी कवितेतली पहिली क्रांती ज्या जर्मन बनावटीच्या स्टीम प्रिंटिंग मशीनमधून बाहेर पडली, त्या यंत्राचं जतन करणारा मराठी साहित्यात कोणीतरी निपजावा ही अपेक्षा नक्कीच अनाठायी नाही. 

मराठीतल्या निरक्षर मानल्या गेलेल्या बहिणाबाई चौधरी या मोठ्या कवयित्रीने एका कवितेत नाना फडणीस आणि त्यांच्या या स्टीम प्रिंटिंग मशीनला आपल्या शब्दांनी अमर करून ठेवण्याचा द्रष्टेपणा केव्हाच दाखवला आहे. शिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या आम्हाला त्याचं मोल आहे की नाही, हाच प्रश्न आहे. लौकिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या बहिणाबाईंना जे सत्य जाणवलं ते आम्हाला न जाणवल्यास खरे निरक्षर कोण हा प्रश्न विचारून आपणच आपलं मूल्यमापन करावं.

मंमई बाजारावाटे

चाले धडाड-दनाना

असा जयगावामधी

नानाजीचा छापखाना

 

नानाजीचा छापखाना

त्यात मोठे मोठे पुठ्ठे

तसे शाईचे दराम

आन कागदाचे गठ्ठे

 

किती शिशाच्या चिमट्या

ठसे काढले त्यावर

कसे निंघती कागद

छापीसनी भरभर

 

चाले छाप्याचं यंतर

जीव आठे बी रमतो

टाकीसनी रे मंतर

जसा भगत घुमतो

 

मानसापरी मानूस

राहतो रे येडजाना

अरे होतो छापीसनी

कोरा कागद शहाना

बहिणाबाईंनी आपल्यासारख्या सुशिक्षित माणसाचं मूल्यमापन कदाचित आधीच करून टाकलं आहे : शब्दं छापली की कोरा कागदही शहाणा होतो,पण तो कागद वाचूनही माणूस मात्र येडजानाच राहतो.