Sunday 29 August 2021

जयंत पवारची एक अद्भुत कथा

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र

 

 

कितीही वस्तुनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या साहित्यकृतीची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करण्याच्या प्रयत्नात व्यक्तिगत आवडीचा काही अंश उतरतोच. जयंत पवार यांची छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्याबाबतीही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत. या कथेचा घाट आणि तिच्यातून लेखकाने व्यक्त केलेलं जीवनभान या दोन्ही अंगांनी ही कथा वाचकाला फार समृद्ध करणारा अनुभव देते. मराठी साहित्य, मराठी समाज, कला आणि जीवन यांच्यातलं नातं अशा व्यापक विषयांवर भाष्य करणारी ही कथा मराठीतली श्रेष्ठ कथा आहे असं माझं मत आहे.

जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या पहिल्या कथासंग्रहातली ही अखेरची कथा आहे. पण या कथेपासून कथाकार म्हणून जयंत पवार यांनी एक नवं, निर्णायक वळण घेतलं आहे. याच वळणाने वरणभात लोन्चा न् कोन नाय कोन्चा या त्यांच्या दुसऱ्या कथासंग्रहातल्या कथा अधिक पुढं गेल्या आहेत. तरीही छटाकभर रात्र... या कथेला जयंत पवार यांच्या एकूण कथासाहित्यात आणि एकंदर समकालीन मराठी कथासाहित्यात महत्त्वाचं स्थान आहे.

कादंबरीच्या तुलनेत कथेचा अवकाश लहान, मर्यादित असतो. या मर्यादित अवकाशात एखादा कथाकार अनेक आशयसूत्रांची, रचनेच्या,कथनाच्या बहुविध पातळ्यांची अशी काही व्यामिश्र बंदिश रचतो की वाचकाने थक्क व्हावं. जयंत पवारांची छटाकभर रात्र... ही कथा अशा तऱ्हेचा अनुभव देते.

या कथेचा आकृतिबंध एका गुन्हेगारकथेचा किंवा रहस्यकथेचा आहे. पण मानवी अस्तित्वाचं आणि दुःखाचं नातं काय असतं या सनातन आधिभौतिक (metaphysical) रहस्याचा मागोवा हे या कथेचं मुख्य आशयसूत्र आहे. खून, मारामाऱ्या आणि अपघात याही कथेत आहेत. पण त्यासोबत बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बसून केलेल्या जीवनाविषयीच्या तात्त्विक चर्चा आहेत. मुंबईसारख्या महानगरातलं गुंड, दारुड्यांचं अधोविश्व आणि लेखक-कवींचं जग या दोन जगांचं ब्लेंडिंग छटाकभर रात्र... या कथेत जयंत पवार यांनी अत्यंत परिणामकारकरित्या केलं आहे.  

रहस्यकथेत अखेरपर्यंत सामान्यतः रहस्य उलगडलेलं असतं; गुन्हेगार कोण याचं उत्तर दिल्याशिवाय रहस्यकथा संपत नाही. छटाकभर रात्र...या कथेत मात्र लेखकाने कथेच्या गाभ्याशी असलेला मुख्य प्रश्न अनुत्तरित ठेवलेला आहे. आणि केवळ गाभ्याचा प्रश्न नव्हे, तर रहस्यमय कथानकातले आणि त्याच्याआड दडलेल्या मानवी जीवनाच्या सत्याविषयीचे सगळेच प्रश्न लेखकाने अधांतरी सोडून कथा संपवली आहे. ही अशी विपरित रहस्यकथा आहे. 

रहस्यकथेचा असा विपरित आकृतिबंध लेखकाने का योजला असेल? आधुनिक साहित्यात खूपविक्ये (bestsellers), लोकप्रिय साहित्यप्रकार बिनप्रतिष्ठेचे मानले जातात. गंभीर साहित्यप्रकार अभिरुचीच्या शिडीवर वरच्या पायरीवर प्रस्थापित झालेले असतात. अलीकडे उत्तराधुनिकवादी विचाराने जीवनातल्या अनेक श्रेणीव्यवस्थांना सुरूंग लावला, त्यात साहित्यप्रकारांची ही श्रेणीव्यवस्थाही कोसळली. लोकप्रिय साहित्याचे आकृतिबंध आणि गंभीर आशय यांचं ब्लेंडिंग केलं जाऊ लागलं. जयंत पवार यांनी छटाकभर रात्र...मध्ये असं ब्लेंडिंग केलं आहे, ते केवळ प्रयोग म्हणून नव्हे. गंभीर जीवनाशय मांडताना त्याच्या विपरित वाटणारा लोकप्रिय कथाप्रकार निवडून त्यांनी सध्याच्या जीवनाविषयी एक महत्त्वाचं भाष्य अतिशय सूचकपणे केलं आहे.

जयंत पवारांनी आकृतिबंध निवडलाय तो रहस्यकथेचा. आता रहस्यकथा या साहित्यप्रकाराची मूलप्रेरणा काय आहे? तर सत्याचा शोध घेणे. प्रत्येक रहस्याच्या मुळाशी एक न उलगडलेले सत्य असतेच; आणि पुराव्यांचा कसोशीने शोध घेऊन त्यांच्यातील संगती शोधल्यास, अन्वय लावल्यास ते सत्य सापडते, असा विश्वास रहस्यकथेच्या निर्मितीमागे आहे. रहस्यकथेच्या मूलप्रेरणेचं नातं पुन्हा आधुनिक जीवनदृष्टीशी आहे. विवेकशील,वस्तुनिष्ठ दृष्टीने शोध घेत गेल्यास मानव सृष्टीचं रहस्य भेदून सत्य ज्ञान हस्तगत करू शकतो असा दुर्दम्य आत्मविश्वास या आधुनिक जीवनदृष्टीत आहे. सगळ्या आधुनिक शास्त्र-विज्ञानांचा उदय याच जीवनदृष्टीतून झाला आहे. तिथे सत्याचा ठामपणा आहे. रहस्यकथेचं थेट नातं या ठामपणाशी आहे. 

याच्या उलट जयंत पवार यांच्या कथेचा रहस्यकथालेखक असलेला निवेदक जरी सत्याचा पाठपुरावा करत असला, तरी सत्य शोधण्यात त्याला सपशेल अपयश येतं. तो लोकप्रिय रहस्यप्रधान-गुन्हेगारी कथालेखक असला, तरी त्याची ही कथा मात्र रूढ प्रकारची क्राइमस्टोरी नसल्यामुळे कुठेही प्रसिद्ध होऊ शकत नाही. त्याआधी हा लेखकच संसर्गजन्य तापाच्या साथीत मरून जातो. कथा गंभीर वळणाची नसल्यामुळे तिला प्रतिष्ठित दर्जा मिळणं तर शक्यच नसतं, आणि रहस्याचा भेद करू न शकल्यामुळे (फसलेली गुन्हेगारी कथा झाल्यामुळे) ती रहस्यकथा म्हणूनही उभी राहू शकत नाही; तिला प्रसिद्धीचा प्रकाशही दिसत नाही. अशा प्रकारे जयंत पवारांनी बाज रहस्यकथेचा स्वीकारला आहे, पण रहस्यकथेचं मूलतत्त्वच मोडीत काढलं आहे. मानवी जीवनातला सत्याचा शोध अखेर संदिग्धतेच्या धुक्यात हरवून जातो, सत्य हे मानवी आकलनापलीकडे राहतं, असं या रहस्यकथेतून सुचवलं आहे. 

पण जयंत पवार इथंच थांबत नाहीत. रहस्यकथेचा निवेदक किंवा इतर पात्रं सत्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीत? हा प्रश्न त्यांनी कथेच्या अखेरच्या भागात उपस्थित केलेला आहे. आणि तिथं आपल्या लक्षात येतं की, लेखकाने लोकप्रिय, खूपविक्या साहित्यप्रकाराचा आकृतिबंध योजून एकप्रकारे या प्रश्नाचं, समस्येचं निदान करण्याचा प्रयत्न केला आहे. ते निदान काय आहे याचा विचार शेवटी करू. इथं एवढं मात्र नमूद करू की, श्रेष्ठ साहित्यकृतीचा घाट देखील तिच्या आशयाचा, लेखकाच्या जीवनदृष्टीचा अविभाज्य भाग होऊन अनुभवास येत असतो. हा अनुभव छटाकभर रात्र...ही कथा देते म्हणून ती श्रेष्ठ कथा आहे.

 

प्रत्यक्ष आयुष्यात सत्य हे संदिग्ध असतं, त्याविषयी नेमकं काही सांगता येत नाही, हा अनुभव अनेकांनी घेतलेला असू शकतो; साहित्यातही हा अनुभव मांडणारी छटाकभर रात्र... ही काही एकमेव साहित्यकृती नव्हे. मग या कथेत वेगळं, नवं काय आहे? का ही कथा एक ताजा अनुभव देते?याचं उत्तर आपल्याला, जयंत पवारांनी या कथेमध्ये परस्परविरुद्ध भासणाऱ्या, पण कथानकात अगदी एकजीव झालेल्या बहुविध संदर्भांमध्ये सापडेल.

बऱ्याच लेखकांना प्रत्यक्षातल्या व्यक्तींवरून पात्रं बेतण्याचा, आणि वाचकाला ती पात्रं कोणत्या व्यक्तीवरून घेतलेली आहेत हे सहज लक्षात यावं असे दुवे कथानकात सोडण्याचा नाद असतो. अशा लेखकांनी रंगवलेली पात्रं बहुतेकदा प्रत्यक्षातल्या व्यक्तींचे कॅरिकेचर्स तरी असतात किंवा प्रत्यक्षातील व्यक्तींच्या चरित्रात्मक तपशिलावरच पात्रं हुबेहूब उभारलेली असतात. छटाकभर रात्र... या कथेत रहस्यकथाकारम्हणून स्वतःची ओळख करून देणारा निवेदक आणि कवी म्हणून वावरणारी चार पात्रं प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींवर बेतलेली आहेत. पण कथेतली ही पात्रं ना प्रत्यक्षातल्या व्यक्तींची कॅरिकेचर्स आहेत, आणि ना त्यांच्या जीवनातल्या केवळ चरित्रात्मक तपशिलांचा वापर लेखकाने पात्रनिर्मितीसाठी केला आहे. प्रत्यक्षातल्या लेखक-कवींची व्यक्तिमत्त्वं, वैचारिक भूमिका, जीवनदृष्टी यांचं कथेतल्या पात्रांवर कलम करून, त्यांच्या तोंडून, त्यांच्या भिन्न दृष्टिकोनांतून जीवनासंदर्भातल्या मूलभूत प्रश्नांवर विविध कोनांतून प्रकाश टाकण्याचं लेखक जयंत पवार यांनी कौशल्य दाखवलं आहे; जे लाजवाब आहे. या कथेचा रहस्यकथाकार निवेदक म्हणजे एकेकाळचा मराठीतला लोकप्रिय गुन्हेगारी कथाकार श्रीकांत सिनकर होय, हे वाचकाला कळतं. अरुण म्हणजे अरुण काळे आणि भुजंग म्हणजे भुजंग मेश्राम हे विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात दमदार कविता लिहून अकाली मृत्यू पावलेले कवी. कथेत, हातातल्या कवितेच्या वह्यांसकट धावत्या रेल्वेतून स्वतःला झोकून देऊन अस्तित्वाची दुखरी नस संपवून टाकणारा राजापुरे म्हणजे नव्वदच्या दशकात रेल्वेखालची अपघात की आत्महत्या अशी स्वतःच्या मृत्यूची मीमांसा संदिग्ध ठेवून लहान वयातच मरण पावलेला विवेक मोहन राजापुरे. आणि नशेच्या तारेत संज्ञाप्रवाही विचार प्रकट करत समुद्राच्या पाण्यात नाहिसा होणारा मन्या म्हणजे साठोत्तरी पिढीतला मनस्वी कलंदरपणे स्वतःचं आयुष्य उधळून टाकलेला कवी मनोहर ओक.  

मानवी अस्तित्व आणि दुःख यांचं नातं काय आहे, हा सनातन प्रश्न या कथेच्या मुळाशी आहे. कथेतले कवी सातत्याने या प्रश्नाविषयी बोलताहेत. रहस्यकथाकार असलेल्या निवेदकासाठी अर्थातच हा प्रश्न फारसा आस्थेचा नाही. आधी झुमरू बारमध्ये, नंतर ब्लू विंटरमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी वावरणाऱ्या बारबालेचं खरं नाव काय? तिची आयडेंटीटी काय? तिचं रक्षण करणारा बबलू तिचा नक्की कोण? आणि शेवटी तिचा खून कोणी केला? हे प्रश्न या रहस्यकथाकार असलेल्या निवेदकासाठी महत्त्वाचे असणं स्वाभाविक आहे. या प्रश्नांचा तो पाठपुरावा करतो. भुजंग, अरुण हे त्याचे कविमित्र जीवनातल्या गंभीर प्रश्नांवर कविता लिहिणारे, चर्चा करणारे, या रहस्यकथाकाराला तापदायक वाटत असले, तरी मित्र म्हणून बारमध्ये रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्यासोबत भटकताना तो त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या गुंताळ्यात गुरफटला जातो.  

भुजंग आणि अरुण हेही दोघे त्याच बारबालेच्या रहस्याचा शोध घेत आहेत. पण दोघांचे उद्देश पुन्हा वेगळे आहेत. गावाकडून मुंबईत पळून आलेल्या एका प्रिय मुलीच्या शोधात अरुण आहे. तीच ही बारबाला असावी असं त्याला वाटतं. आणि आदिम जाणिवेच्या कविता लिहिणारा भुजंग तिच्याकडे स्वतःतल्या आदिम प्रेरणांचं भक्ष्य म्हणून पाहतो. ती बारमध्ये नाचणारी मुलगी या सर्वांसाठीच एक रहस्य बनलेली आहे. या कथेत मानवी जीवनातल्या अनाकलनीयतेचं ती प्रतीक आहे. सबंध कथेत ती दिसत, वावरत राहते. परंतु तिचं बोलणं, व्यक्त होणं याला लेखकाने कथेत कुठंही जागा दिलेली नाही. तिला संदिग्ध ठेवलं आहे. भोवतीची पात्रं तिच्या आयडेंटिटीची चाचपणी करताना, तिच्या खरेपणाचा शोध घेताना केवळ दिसतात.

आपल्याला वाचक म्हणून हे माहीत आहे की भुजंग मेश्राम आणि अरुण काळे हे दोघे मराठी साहित्याच्या वंचित-विद्रोही परंपरेतले कवी होते. जयंत पवार यांनी त्यांच्या कवितांमधल्या जाणिवांचा, जीवनदृष्टीचा अतिशय कलात्मक उपयोग छटाकभर रात्र... या कथेत अस्तित्व आणि दुःख याविषयीच्या डिस्कोर्समध्ये करून घेतला आहे. विशेषतः शोषणाविषयीची त्यांची चर्चा या संदर्भात वाचण्यासारखी आहे. रहस्यकथाकार निवेदकाचा मित्र अरुण बारबालेच्या शोषित जीवनाकडे बुद्धाच्या करुणामयी नजरेने पाहतो. भुजंगच्या मते मात्र ती बारबाला बडे बाप का बेटा असलेल्या विराट ढोलकियाची गुलामी करताना त्या ढोलकियालाही वापरून घेते. एकप्रकारे ती आपल्या शोषकाचं शोषण केल्याचं समाधान मिळवते. शोषिताने शोषकाला असं वापरून घेणं, काही काळासाठी का होईना शोषक बनणं हा त्याच्यासाठी प्रतिरोधाचा एक मार्ग असतो, असं भुजंग म्हणतो. या पात्रांच्या द्वारे जयंत पवार यांनी साठोत्तरी मराठी साहित्यात आढळणाऱ्या जीवनदृष्टीचे विविध पदर या कथेत एकत्र आणून परस्परांसमोर उभे केले आहेत. 

दुःखामुळे अस्तित्वाची जाणीव अधिक ठसठसते की अस्तित्वाच्या जाणिवेमुळे दुःखाचा छळ सोसावा लागतो, आणि याचा साहित्यनिर्मितीशी काय संबंध असतो – हा प्रश्न या कथेत सर्वत्र भरून राहिला आहे. राजापुरे म्हणतो, अस्तित्वाला दुःखाची नाळ जोडलेली आहे..तीच तोडून टाकलेली बरी. आणि असं म्हणून तो धावत्या रेल्वेखाली काळोखात झेपावतो. मन्या सार्वत्रिक सत्य सांगितल्याच्या थाटात, तुम्ही आम्ही आपण सर्व विश्वाच्या विक्राळ पसाऱ्यासमोर अतिक्षुद्र आहोत, त्यामुळे असल्या प्रश्नांची उत्तरं शोधणंच मूर्खपणाचं आहे. भुजंग अत्यंत बेफिकीरपणे जगून स्वतःचं शरीर तोळामासा करतो. एका बेसावध क्षणी निवेदकाला अज्ञात अशा रहस्यमय रीतीने भुजंग आणि अरुण दोघंही मरतात. त्यांचाही खून झालाय की मृत्यू हे निवेदकाला अनाकलनीय राहतं.

“या शहरातून कवीच कसे एकेक करून नाहिसे होत चाललेत?” असा प्रश्न कथेच्या अखेरीस रहस्यकथाकाराला पडतो. इथं कवी हे समाजाच्या संवेदनशीलतेचं, समाजातल्या जागरूक जागल्यांचं प्रतिक म्हणून अधोरेखित झाले आहेत. ही संवेदनशीलता, जीवनभान हे जीवनाविषयीच्या अनाकलनीय प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक आहेत, असं या कथेच्या लेखकाला सुचवायचं आहे. म्हणजे एकीकडे जीवनाविषयीच्या अनाकलनीय प्रश्नांची उत्तरं शोधणं अवघड होत चाललंय, आणि दुसरीकडं त्यांचा शोध घेऊ शकणारी समाजाची संवेदनशक्तीच हरवून जात आहे, या भीतीदायक वस्तुस्थितीकडे त्याने लक्ष वेधलं आहे.

 

      इथं एक गोष्ट स्पष्ट होते : मानवी जीवनात सत्य शोधणं अशक्य होऊन बसलं आहे, सत्याचा शोध अखेर संदिग्धतेच्या प्रदेशात दिशाहीन अवस्थेत संपतो, असा आशय व्यक्त करून छटाकभर रात्र...चा लेखक थांबलेला नाही. तर पुढं जाऊन असं का होतं आहे, याचा शोध त्याने घेतला आहे. कथेतल्या एका वस्तुस्थितीकडे त्याने निर्देश केला आहे : कवींचं नाहिसं होणं. 

रहस्यकथाकार कथा कशासाठी लिहितो? वाचकांचं मनोरंजन करण्यासाठी. त्यांना रहस्याचा भेद झाल्याचा आनंद देण्यासाठी. पण या कथेतल्या रहस्यकथाकार निवेदकाला रहस्याचा भेद तर करता येत नाहीच; पण त्याला न झेपणारे प्रश्न त्याच्यावर एकामागून एक येऊन आदळू लागतात. राजापुरेने रेल्वेतून उडी मारली, मन्या समुद्र चिरत नाहीसा झाला आणि अखेरीस भुजंग आणि अरुण यांचाही मृत्यू झाला; या प्रकाराने भयंकर अस्वस्थ होऊन तो म्हणतो, “कशासाठी दोघं भांडले? कशाच्या मागे लागले? कशासाठी लिहीत राहिले? शब्दांचा जन्म देत राहिले? प्रत्येकजण एकेक रहस्य शोधत असतो की काय? आणि नष्ट होतो?” जयंत पवार इथं दाखवतायत की या कवींसारखे लोक आपलं आयुष्य पणाला लावून, उधळून टाकून आपल्या लिखाणावाटे अस्तित्वाविषयीच्या, सामाजिक शोषणाविषयीच्या असाध्य व्याधींची मूळं खणून काढण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या व्यवस्थेमुळे अशा कवींचाच बळी जाणार असेल, आणि आपण त्यांच्या नाहिसं होण्याविषयी जराही आस्था, चिंता दाखवणार नसू, तर आपल्याला जीवनाविषयीचं कुठलं सत्य गवसणार आहे? जीवनाविषयीच्या कुठल्याही प्रश्नाचं रहस्य उलगडणं आपल्याला अशक्य होऊन बसेल. कवींचं नाहीसं होणं म्हणजे समाज स्वतःची संवेदनशीलता हरवून बसणं.

      कथा संपताना जाणवतं की जयंत पवारांनी वाचकांना (म्हणजे आपल्याला) या रहस्यकथेच्या निवेदकाच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. निवेदकाला कथेतलं वास्तव अनाकलनीय, झेपेनासं झालं आहे, तशीच एकंदर जीवनाविषयी आज आपली अवस्था आहे. रहस्यकथेच्या रूढ, लोकप्रिय आकृतिबंधाला झेपत नाहीत, असे प्रश्न लेखकाने या रहस्यकथेत हेतुपूर्वक उपस्थित केले आहेत. त्यातून लेखकाला सुचवायचं आहे की आपली अवस्था या कथेसारखी उथळ बधीर झाली आहे. कथेचा घाटसुद्धा आशय व्यक्त करतो, लेखकाचं जीवनभान व्यक्त करतो, ते अशाप्रकारे.

आणि हे करत असताना लेखक आपल्याला आपण काय गमावून बसतो आहोत, तेही दाखवतो आहे. मनोहर ओक, विवेक मोहन राजापुरे यांची अस्तित्वाचा तळ शोधू पाहणारी आधुनिकवादी चिंतनशीलता, भुजंगच्या कवितेतला विद्रोह, अरुण काळेच्या कवितेतली बुद्धाची करूणामय दृष्टी यांचं जसं मराठी साहित्यातून विघटन होतं आहे, तसंच समाजमनातूनही ही दृष्टी, विचार, प्रेरणा नाहीशा होत आहेत. एका अर्थाने या कथेने साठच्या दशकापासून निर्माण झालेल्या मराठी साहित्याची समीक्षा केली आहे, तर दुसरीकडे आपल्या समाजाचा चिकित्सक वैचारिक वारसा कोणता याचं निदान केलं आहे, आणि तो गमावत असल्याबद्दलची चिंता अत्यंत कलात्मक परिमाणांद्वारे व्यक्त केली आहे. अशी थोर कथा क्वचितच लिहिली जाते आणि कायमची लक्षात राहते.

(रोहन साहित्य मैफल’ या रोहन प्रकाशनाच्या गृहपत्रिकेने 'गेल्या वीस वर्षांतल्या मला सर्वाधिक आवडलेल्या कथे'विषयी लिहायला सांगितलं. त्यासाठी लिहिलेला हा लेख 'रोहन साहित्य मैफली'च्या नोव्हेंबर २०२० च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.) 

1 comment:

  1. लेख आवडला। कथा वाचण्याची तीव्र इच्छा झाली, पुस्तक मिळवून नक्की वाचतो।

    ReplyDelete